हिंगोलीत ‘शासन आपल्या दारी’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद* *सिंचन साखळीतून हिंगोलीचा औद्योगिक विकास करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही* - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Sunday, 10 March 2024

हिंगोलीत ‘शासन आपल्या दारी’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद* *सिंचन साखळीतून हिंगोलीचा औद्योगिक विकास करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही*


 *हिंगोलीत ‘शासन आपल्या दारी’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद*


*सिंचन साखळीतून हिंगोलीचा औद्योगिक विकास करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही*


• *आतापर्यंत ५ कोटीपेक्षा अधिक लोकांना मिळाला लाभ*

• *६० कॅबिनेटमध्ये ५०० लोकाभिमुख निर्णय*

• *विविध विकासकामांचे लोकार्पण*


हिंगोली दि. १० : हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर्णा, पैनगंगा व अन्य नद्यांवर साखळी बंधाऱ्यांची श्रृंखला उभारून या जिल्ह्याच्या सिंचनाचा अनुशेष दूर करण्यात येईल. सिंचन साखळीतून हिंगोलीचा औद्योगिक विकास करण्यासाठी आमचे शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. 


हिंगोली येथील रामलीला मैदानावर ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध योजनांचे हजारो लाभार्थी व जिल्हाभरातून मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. महाराष्ट्रात आतापर्यंत ५ कोटींपेक्षा अधिक लाभार्थ्यांना ‘शासन आपल्या दारी’ योजनेतून विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये विविध विभागांच्या शासकीय योजनांमधील १४ लक्ष ५२ हजारावर लाभार्थ्यांना जिल्ह्यामध्ये लाभ मिळाला आहे. हा लाभ ७७४ कोटी रुपयांचा आहे.


व्यासपीठावर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री विप्लव बाजोरिया, तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, राजू नवघरे, बालाजी कल्याणकर, विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर आदी मान्यवर उपस्थित होते.


आपल्या भाषणामध्ये हिंगोलीच्या सिंचनाच्या अनुशेषावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला. जिल्ह्यात सिंचनासंदर्भातील अनेक प्रयोग केले जातील. हिंगोलीला रोजगार देण्याच्या दृष्टीने सिंचनाच्या माध्यमातून औद्योगिक विकास साधला जाईल. पूर्णा नदीवर बंधारे व्हावेत, यासाठी यापूर्वी आंदोलने झालीत. मात्र हे शासन आल्यावर बंधारे बांधण्याचे काम पूर्ण करीत आहोत, ज्यातून २०  हजार एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात कयाधू नदीला कालव्याद्वारे जोडले जाणार आहे. लवकरच हा प्रकल्प हाती घेतला जाईल. पैनगंगा नदीवरील सात बंधारे ही पूर्ण केले जातील. त्यातून ५० हजार एकर सिंचनक्षमता निर्माण होणार आहे हे सांगून हे  जलद गतीने निर्णय घेणारे सरकार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 


*गतिमान अंमलबजावणी*

गेल्या दीड वर्षांमध्ये अवघ्या ५५ ते ६० कॅबिनेट बैठकामध्ये ५०० लोकाभिमुख निर्णय या सरकारने घेतले आहेत. हे सर्व निर्णय गोरगरीब जनता, शेतकरी व सामान्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणणारे आहेत. वेगवान अंमलबजावणीचे शासन म्हणून जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. हे शासन दोन्ही हाताने देणारे आहे. ८८५ कोटी रुपये खर्च करून हिंगोलीला वैद्यकीय महाविद्यालय उभे राहत आहे. हळद संशोधन केंद्रासाठी १०० कोटी निधी दिला आहे. आणखीही त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केले.  


*आरक्षणासाठी शासनाच्या पाठीशी उभे राहा*


छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठ्यांना आरक्षणाचा शब्द दिला होता. माझा शब्द मी पाळला आहे. मराठा समाजाला त्याचा नक्कीच लाभ होईल. पोलीस भरतीमध्येसुद्धा हे आरक्षण लागू केले आहे. ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न देता आरक्षण देण्याचे काम आम्ही केले आहे. टिकणारे आरक्षण देण्यासाठी सर्वेक्षण करून विशेष अधिवेशनात १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.  


*सीएम म्हणजे कॉमन मॅन*


कोणत्याही राजकीय अहंकारापोटी राज्याचे नुकसान होणार नाही,यासाठी आपला प्रयत्न आहे. मी आपल्या आशीर्वादाने संघर्ष पत्करून मुख्यमंत्री झालो आहे. सामान्य कार्यकर्ता, शेतकऱ्याचा मुलगा तुमच्यामुळे मुख्यमंत्री झाला आहे. सीएम म्हणजे मुख्यमंत्री नव्हे तर सीएम म्हणजे तुमच्यासारखे ‘कॉमन मॅन’ असे सांगून त्यांनी हे सरकार सामान्यांतल्या सामान्यासाठी योजना आणेल व त्याची गतिशील अंमलबजावणी करेल. शासन आपल्या दारी हे त्यापैकीच एक अभियान असून, कॉमन मॅनच्या या अभियानाचे, याला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे देशभर या अभियानाबद्दल उत्सुकता असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. 


पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांमध्ये हिंगोली तालुक्याने आघाडी घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात विविध योजनांचा लाभ देण्यासाठी टीम कार्यरत असल्याचे त्यांनी कौतुक केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सिंचनाची क्षमता वाढविण्यासाठी प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. 


खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी पूर्णा नदीवरील बॅरेजेसच्या मान्यतेसाठी मुख्यमंत्र्याचे आभार मानले. उर्वरित सिंचन अनुशेष भरून काढण्याचे आवाहन त्यांनी केले. हळद संशोधन केंद्रासाठी १०० कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल त्यांनी आभार मानताना उर्वरित ३०० कोटी रुपये आणखी वाढविण्याची मागणी केली.


*विविध विकासाचे लोकार्पण व भूमिपूजन*


खाकी बाबा मठ संस्थान परिसराच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती वर्षानिमित्त सुरु करण्यात आलेल्या मागासवर्गीय मुलींचे नवीन शासकीय वसतिगृह आणि मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतीगृहाच्या इमारतींचे ई – लोकार्पण करण्यात आले. शासकीय जिल्हा ग्रंथालय इमारत बांधकामासाठी 7.84 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, त्याचे भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. 

००००